TET Exam पेपर फुटला, धागेदोरे थेट बिहार पर्यंत; दीड कोटींचा व्यवहार उघड करत भिवंडीतून ३ आरोपींना बेड्या!

उद्याची परीक्षा रद्द, परीक्षार्थींमध्ये खळबळ, उपआयुक्त (DCP) झोन २ पवन बनसोड यांच्या पथकाची कारवाई
भिवंडी/ठाणे:
महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब आज भिवंडीत उघडकीस आली. TET Exam Paper Leak प्रकरणाला आता अत्यंत खळबळजनक वळण मिळाले असून पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपी व त्यांच्याकडून पेपरचे चार सेट हस्तगत केले असून पेपर फुटल्याने उद्याची TET परीक्षा रद्द करण्यात आली असून परीक्षार्थीमध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकारांना दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कोनगाव-भिवंडी परिसरामध्ये तीन परप्रांतीय आरोपी पेपरचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलीस उपआयुक्त (DCP) झोन २ पवन बनसोड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील कोनगाव परिसरात सापळा रचून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीन हायप्रोफाईल आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक जण दिल्लीचा असून इतर दोन जण बिहारचे रहिवासी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी टीईटी परीक्षा पेपरचे तब्बल चार संच (sets) हस्तगत केले असून, हे पेपर पुढे तब्बल दीड कोटी रुपयांना विकले जाणार होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या आंतरराज्य टोळीच्या अटकेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता भंग झाल्यामुळे रविवारी होणारी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अप्पर आयुक्त अशोक दुधे यांनी पुढे स्पष्ट केले की, या आंतरराज्य टोळीने महाराष्ट्रात आपले जाळे कुठे कुठे पसरवले आहे, याचा शोध आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. भिवंडीतून हस्तगत केलेले पेपरचे हे चार सेट महाराष्ट्रात कोणत्या एजंट्सना आणि खरेदीदारांना विकले जाणार होते, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असून पोलिसांची तपासचक्रे आता राज्यातील बड्या खरेदीदारांकडे फिरली आहेत.
दिल्ली आणि बिहारमधील या मुख्य सूत्रधारांना महाराष्ट्रातील परीक्षेची गोपनीय माहिती आणि मूळ पेपर नेमका कोणी पुरवला, यामध्ये शिक्षण विभागातील कोणत्या बड्या अधिकाऱ्यांचा किंवा परीक्षा केंद्रांचा हात आहे का, याचा कसून तपास कोनगाव आणि भिवंडी पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा व इतर गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२’ च्या विविध कलमांनुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराज्य धागेदोरे पाहता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एक विशेष तपास पथक अर्थात ‘SIT’ (Special Investigation Team) स्थापन करण्यात आले आहे. भिवंडी झोन २ चे डीसीपी पवन बनसोड स्वतः या हायप्रोफाईल एसआयटीचे नेतृत्व करत असून या पथकात २ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), ९ पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह एकूण २० ते २५ अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अप्पर आयुक्त अशोक दुधे यांनी पुढे स्पष्ट केले की, या आंतरराज्य टोळीने महाराष्ट्रात आपले जाळे कुठे कुठे पसरवले आहे, याचा शोध आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे.
या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील पाऊल आणि अटकेकडे लागले आहे, तपासासाठी तर दुसरीकडे ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो परीक्षार्थींमध्ये मात्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे.











