Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष; माऊलींच्या पालखीचे साताऱ्यात भक्तीमय वातावरणात आगमन,

पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी घेतले पावन दर्शन!
पाडेगाव/सातारा:
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026 संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आज १५ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यात अत्यंत भक्तीभावाने आणि अभूतपूर्व अशा मंगलमय वातावरणात पाडेगाव येथे आगमन झाले आहे. आकाशात फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा सुश्राव्य गजर, आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ महामंत्राच्या जयघोषात तल्लीन झालेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने संपूर्ण पाडेगाव परिसर आणि सातारा जिल्हा भक्तीच्या महापुरात चिंब न्हाऊन निघाला आहे. माऊलींच्या या पवित्र पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर भाविकांनी आणि प्रशासनाने अत्यंत भावपूर्ण तयारी केली होती.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच, जिल्ह्याच्या वतीने सीमेवर भव्य शासकीय स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सोनिया जयकुमार गोरे आणि वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे या सर्व लोकप्रतिनिधींनी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पावन पादुकांचे मनोभावे दर्शन घेत पुष्प अर्पण करून स्वागत केले. तसेच पोलीस बँड पथकाद्वारे विविध सुश्राव्य सुरांची धून वाजवून माऊलींचे साताऱ्यात आदरातिथ्य करण्यात आले.
पवित्र नीरा नदीतील स्नानाचा विधी आटोपल्यानंतर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मैलोन्मैल लांब रांगा लावत शिस्तबद्ध गर्दी केली होती. लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सातारा जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. मार्गावर ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर, मोफत आरोग्य सेवा आणि तात्पुरती फिरती रुग्णालये उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय जागोजागी स्वच्छतागृहांची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने पुरवलेल्या या सोयी-सुविधांबद्दल संपूर्ण वारकरी वर्गाने आणि दिंडी प्रमुखांनी समाधान व्यक्त केले आहे.
आजचा पालखी सोहळा लोणंदनगरी विसावणार असून या ठिकाणी माउलींच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून भाविक गर्दी करतात. यंदा लोणंदला एकच मुक्काम असून उद्या माउलींच्या पालखी सावहल्यातील पहिले गोल रिंगण चांदोबाचा माळ येथे होणार असून पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे.










