Mumbai-Pune Missing Link – मुंबई-पुणे अंतर २० मिनिटांनी घटणार! महाराष्ट्र दिनी राज्याला ‘मिसिंग लिंक’ खुला ; १ मे पासून वाहतूक सुसाट

आशियातील सर्वात रुंद बोगदा आणि उंच पुलाचा थरार; खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आता इतिहासजमा!
मुंबई/लोणावळा: Mumbai-Pune Missing Link मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे’वर प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जाणारा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link Project) हा मार्ग १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन तर वाचणारच आहे, पण खंडाळा घाटातील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि दरडी कोसळण्याच्या धोक्यापासून कायमची सुटका होणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर केवळ ६ किलोमीटरने कमी होत असले, तरी प्रवासाच्या वेळेत तब्बल २० ते २५ मिनिटांची अभूतपूर्व बचत होणार आहे. सध्या प्रवाशांना खंडाळा घाटातील तीव्र वळणांवरून आणि चढ-उतारावरून प्रवास करावा लागतो, जिथे वाहनांचा वेग मंदावतो. मात्र, नवीन ‘मिसिंग लिंक’ मार्ग हा खोपोली एक्झिट ते कुसगाव (लोणावळा) दरम्यानचा कठीण टप्पा पूर्णपणे बायपास करणार आहे. या मार्गाचे डिझाइन ताशी १०० ते १२० किमी वेगासाठी करण्यात आले असून, यामुळे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले आहे. या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे आशियातील सर्वात रुंद १०-लेन बोगदा (Asia’s Widest 10-lane Tunnel). ८.९ किलोमीटर लांबीचा हा बोगदा प्रवाशांना घाटातील अवघड चढणीपासून वाचवेल. तसेच, वाघाडरी जवळ बांधण्यात आलेला ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज (Cable-Stayed Bridge) हा जमिनीपासून तब्बल १५० फूट उंचीवर असून, तो या मार्गाचे मुख्य आकर्षण ठरला आहे.
१ मे रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक लोकार्पणानंतर, प्रवाशांना लोणावळा एक्झिटला न जाता थेट या नवीन लिंकवरून प्रवास करता येईल. बोगद्यांमधील अत्याधुनिक व्हेंटिलेशन, ऑटोमॅटिक लायटिंग आणि हाय-टेक सीसीटीव्ही यंत्रणेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र दिनी राज्याला मिळणारी ही ‘प्रवास भेट’ दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी ठरणार आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या Mumbai-Pune Missing Link प्रकल्पाची पाहणी करून लोकार्पणाच्या अनुषंगाने आढावा घेत समाधान व्यक्त्त केले. येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.
मिसिंग लिंक Mumbai-Pune Missing Link प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.











