Shalinitai Patil
Shalinitai Patil आर्थिक निकषांवरील आरक्षणाची बुलंद भूमिका : शालिनीताई पाटील यांचा वैचारिक वारसा
उद्या सातारारोड येथे अंतिमसंस्कार
मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या व क्रांतिसेनेच्या प्रणेत्या, राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या ज्योती सदन या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय , सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राजकारणात शालिनीताईंनी एक सक्षम आमदार व मंत्री म्हणून ठसा उमटवला. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महाराष्ट्राच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान मान देत सदैव साथ दिली होती.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख “महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण” असा केला होता. कोरेगाव -खटाव तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला होता, तसेच तालुक्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
अंत्यदर्शन उद्या रविवार दि.२१/१२/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत मौजे सातारा रोड येथील चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय या ठिकाणी राहील व त्यानंतर सकाळी ११:३० वाजता मौजे पाडळी स्टे. (सातारा रोड), ता.कोरेगाव, जि.सातारा येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी संपन्न होईल.
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते व नागरिक हळहळले आहेत तसेच राजकीय क्षेत्रांतील अनेकांनी शोकसंदेश व्यक्त करीत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
ठाम, स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेणाऱ्या नेत्या डॉ. शालिनीताई पाटील
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात आर्थिक निकषांवरील आरक्षणाचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. या विषयावर ठाम, स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेत्या दिवंगत डॉ. शालिनीताई पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सामाजिक न्याय, समान संधी आणि गरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच समर्पक ठरतात.
डॉ. शालिनीताई पाटील यांचा जन्म एका सुशिक्षित व सामाजिक जाणिवेच्या कुटुंबात झाला. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते आणि त्याच ज्ञानाच्या बळावर सार्वजनिक जीवनात प्रभावीपणे काम केले. सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकारण ही त्यांची ओळख होती.
सांगली ते सातारा : राजकीय प्रवास
१९५० च्या दशकात सांगली जिल्ह्यातून राजकारणात सक्रिय झालेल्या शालिनीताई पाटील यांनी पुढे सातारा जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवला. कोरेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी त्यांनी चिमणगाव येथील श्री जरंडेश्वर साखर कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. परवानगी मिळेपर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला, ही बाब त्यांच्या चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे.
विकासकामांचा ठसा
१९९९ मध्ये विकासाचे मंत्री म्हणून त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर कोरेगाव तालुक्यात स्वतंत्र कारखाना उभारून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग विजय मिळवला. २००४ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार म्हणून विश्वास संपादन केला.
आर्थिक निकषांवरील आरक्षण : ठाम भूमिका
आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या मुद्द्यावर शालिनीताई पाटील यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका घेतली होती. केवळ जातीय आधारावर नव्हे, तर आर्थिक परिस्थितीही आरक्षणाचा निकष असावा, असा त्यांचा ठाम आग्रह होता. त्यांनी स्थापलेल्या ‘क्रांतिसेना’ या संघटनेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची आवश्यकता त्यांनी सातत्याने मांडली.
आज आर्थिक निकषांवरील आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असताना, शालिनीताई पाटील यांचे विचार आणि भूमिका नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. सामाजिक न्यायासाठीचा त्यांचा लढा आणि निर्भीड राजकारणाचा वारसा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. एक परखड आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपल्यातून निघून गेले आहे. राजकारणासोबतच त्यांनी समाजकारणात दिलेले योगदान सुद्धा मोठे होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांचा शोकसंदेश
राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा.” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दात शरद पवार यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे





