Shambhuraj Desai राजकारणाच्या धावपळीत जेव्हा ‘पालक’ खऱ्या अर्थाने जागा होतो! साताऱ्यात शिवतीर्थावर ८० वर्षांच्या आजीला पाहून अचानक थांबला शंभूराज देसाईंचा ताफा; काय घडले त्या क्षणी?

महाराष्ट्र वन न्यूज |विशेष स्टोरी
साताऱ्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील धावपळ, बैठकांचा धडाका आणि व्हीआयपी प्रोटोकॉल या सगळ्याच्या मध्ये शनिवारी शिवतीर्थावर एक असा प्रसंग घडला, ज्याने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. पोलीस प्रशासनाच्या बैठकीवरून परतत असताना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे लक्ष रस्त्याकडेला, शिवतीर्थाच्या भिंतीलगत अगदी हताश आणि एकाकी बसलेल्या एका ८० वर्षीय वृद्धेकडे गेले. वाहनांचा मोठा ताफा आणि सुरक्षेचा गराडा बाजूला सारत पालकमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली अन् थेट त्या आजीच्या शेजारी जाऊन खाली बसले.
‘आजी, काही खायचंय का?’; आपुलकीच्या शब्दांनी पाणावले डोळे
गाड्यांचा ताफा अचानक थांबल्याने आणि भोवती गर्दी जमल्याने ती वृद्ध महिला काहीशी बावरली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी अत्यंत आपुलकीने आणि घरच्या माणसासारखा तिच्या डोक्यावर हात ठेवला. “आजी, कुठून आलाय? गाव कोणतं? कुठे सोडायचं का तुम्हाला? काही खायचं आहे का?” अशा साध्या आणि आपुलकीच्या प्रश्नांनी त्यांनी त्या आजीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. बावरलेल्या अवस्थेत आजीने “शाहूनगर… अंबाबाईचं देऊळ… मुलगा डॉक्टर आहे…” एवढेच अस्फूट शब्द उच्चारले.
“पोलिसांची गर्दी करू नका, प्रेमाने चौकशी करा”; पोलिसांना कडक निर्देश
वृद्ध आजीची ती अवस्था पाहून पालकमंत्र्यांच्या मनातील संवेदनशीलता जागी झाली. त्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलीस यंत्रणेला तात्काळ पाचारण केले. “या आजीच्या कुटुंबीयांचा तातडीने शोध घ्या आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचवा. जर कुटुंबीय सापडले नाहीत, तर त्यांची रवानगी तात्काळ शासकीय वृद्धाश्रमात करून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना दिले.
विशेष म्हणजे, महिला पोलीस आल्यावर पालकमंत्र्यांनी त्यांनाही बजावले, “आजीभोवती मोठा गराडा किंवा पोलिसांचा धाक दाखवू नका. अगदी घरगुती आणि कौटुंबिक पद्धतीने प्रेमाने विचारपूस करून पुढील सोय करा.”
ना प्रसिद्धीचा स्टंट, ना नियोजित कार्यक्रम; फक्त निव्वळ माणुसकी!
सध्याच्या काळात राजकीय नेत्यांची प्रत्येक कृती कॅमेऱ्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी असते, असा सामान्य जनतेचा समज असतो. मात्र, शिवतीर्थावर घडलेला हा प्रसंग कोणत्याही कॅमेऱ्यासाठी किंवा कार्यक्रमाचा भाग नव्हता. राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या अथांग व्यापातून जात असताना एका अनोळखी वृद्धेची व्यथा पाहून ताफा थांबवणे आणि तिची एका पालकासारखी काळजी घेणे, यातून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यातील एक संवेदनशील आणि सच्चा माणूस सातारकरांना पाहायला मिळाला. सत्तेची खरी ताकद मोठ्या भाषणांत नाही, तर रस्त्यावर हताश बसलेल्या गरिबासाठी गाडी थांबवण्यात असते, हेच या प्रसंगाने सिद्ध केले.












