महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹31,628 कोटींचं मदतपॅकेज जाहीर

मुंबई | प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे. अतिवृष्टी, पूर आणि गारपीटमुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल ₹31,628 कोटींचं भव्य मदतपॅकेज जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, “शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 68 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारने या नुकसानीचा विचार करून ₹18,000 कोटींपेक्षा अधिक निधी पीक नुकसानभरपाईसाठी राखीव ठेवला आहे.
सरकारने तीन प्रकारच्या शेतीनुसार नुकसानभरपाई जाहीर केली आहे – कोरडवाहू शेतकऱ्यांना ₹18,500, हंगामी बागायतींना ₹27,000, आणि बागायती शेतकऱ्यांना ₹32,500 प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष योजना जाहीर केली आहे. अशा शेतकऱ्यांना ₹47,000 रोख रक्कम तसेच मनरेगा कामांतून ₹3 लाखांपर्यंत रोजगार हमीचा लाभ देण्यात येणार असून, एकूण मदत ₹3.47 लाख प्रति हेक्टर इतकी मिळेल.
याशिवाय, नष्ट झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी ₹50,000 पर्यंत अनुदान, दुधाळ जनावरांसाठी ₹37,000, विहिरीतील गाळ काढण्यासाठी ₹30,000, आणि कुक्कुटपालनासाठी ₹100 प्रति कोंबडी इतकी मदत मिळेल. झोपडी, गोठा किंवा दुकानांचे नुकसान झाल्यासही ₹50,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक आघाडीलाही दिलासा देण्यात आला आहे. कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, तसेच शेतकरी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी जाहीर करण्यात आली आहे. विमा कंपन्यांना तातडीने भरपाई देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
या पॅकेजचा लाभ 72 ते 73 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, दिवाळीपूर्वी निधी जमा करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलणार असून, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





