कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते सन्मान
५ लाख ५१ हजाराचे बक्षीस जिंकले
पाणी फाउंडेशन यांच्या वतीने समूह शेती आणि सेंद्रिय शेतीच्या संवर्धन आणि वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाने दमदार कामगिरीच्या जोरावर कोरेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला, या अव्वल कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ५ लाख ५१ हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.
पाणी फाऊंडेशन तर्फे आज बालेवाडी स्टेडियम पुणे येथे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज संपन्न पडला. हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री. माणिकराव कोकाटे, अभिनेते अमीर खान, तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात कोरेगाव तालुक्यातून देऊर या गावच्या फार्मर्स ग्रुपला तालुकास्तरीय पारितोषिक मिळाले. गटाच्या महिला सदस्यांनी गेल्या वर्षभरापासून शेतीमध्ये एकजुटीने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीमूल्यवर्धन चळवळ वाढवली त्या कामगिरीच्या जोरावर आज तालुक्यात प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले.
फार्मर्स ग्रुपच्या केशव देशमुख व कविता देशमुख यांच्या मोलाच्या सहकार्यातून शेतकरी गटाने ही कामगिरी केली.
या फाउंडेशन तर्फे केला जाणाऱ्या कामांमध्ये शेतकरी बांधवांची प्रगती होत आहे. तरीही सर्व देऊरवासिय शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायला हवे या यशात सर्वांचे मिळालेले सहकार्य मोलाचे आहे असे कविता देशमुख यांनी सांगितले
या यशाबद्दल देऊरमधील संस्था, युवक मंडळ व शेतकरी ग्रामस्थांनी महालक्ष्मी शेतकरी गटाचे अभिनंदन केले.

