Pune palkhi 2026 ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात आळंदी दुमदुमली! अलोट उत्साहात माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान!

इंद्रायणीला महापूर तरीही वारकरी उत्साहात, प्रशासनाकडून चोख काळजी
प्रकाश राजे /आळंदी : Pune palkhi 2026 “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा गगनभेदी जयघोष, टाळ-मृदंगाचा खणखणाट आणि वैष्णवांच्या अथांग उत्साहाच्या साक्षीने, आज बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी जगद्गुरु संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी नगरीतून पंढरपूरकडे अत्यंत भक्तीभावात प्रस्थान झाले आहे. निसर्गाच्या साक्षीने आणि पावसाच्या रिमझिम सरींमध्ये वारकऱ्यांच्या भक्तीचा पूर इंद्रायणीच्या काठावर ओसंडून वाहत होता.
यंदा पडत असलेला मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासकीय नियमांनुसार मंदिर परिसरात मर्यादित आणि नियंत्रित प्रवेश ठेवण्यात आला होता. मात्र, यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहात तीळमात्रही कमतरता नव्हती. मानाच्या ५६ दिंड्यांचे प्रतिनिधी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त, सोहळा प्रमुख आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळ्याचे सर्व पारंपरिक आणि शासकीय विधी अत्यंत थाटात पार पडले.
दुपारी जेव्हा माऊलींच्या पवित्र समाधी मंदिरातून मुख्य पादुका बाहेर आल्या तेव्हा माऊलीचा एकच गाजर झाला. पुढे माउलींचा अश्व व त्या पाठोपाठ माउलींच्या पादुका सजवलेल्या पालखीतून मंदिर प्रदिक्षणा करीत मार्गस्थ झाला यावेळी वारकऱ्यांचा उत्साह टिपेला पोहचला. तेव्हा उपस्थित हजारो भाविकांनी दोन्ही हात उंचावून “माऊली माऊली” चा एकच जयघोष केला. या क्षणी संपूर्ण आळंदी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. यंदा माउलींचा रथ नव्याने तयार करण्यात आला असून संपूर्ण चांदीने सजवण्यात आला आहे.
तत्पूर्वी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
आळंदी येथील मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती वारकऱ्यांना अनुभवाला मिळत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
आळंदी परिसरात येणाऱ्या भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा, निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, महिला स्नानगृह, मोबाईल चार्जिंग चार्जिंग स्टेशन, चौकाचौकात पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त, स्वच्छता पथक तैनात, भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण उद्घोषण यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर, परंपरेनुसार माऊलींच्या पालखीचा आजचा पहिला रात्रीचा मुक्काम आळंदी येथीलच ‘आजोळघरी’ (दर्शन मंडप) येथे असणार आहे. या ठिकाणी रात्रभर भजनाचा, कीर्तनाचा आणि विठ्ठल नामाच्या जागरणाचा विलोभनीय सोहळा रंगणार आहे. त्यानंतर उद्या गुरुवार, ९ जुलै रोजी सकाळी हा वैष्णवांचा मेळा अलोट उत्साहात पुढील प्रवासासाठी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल.









