
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी दिल्ली/ दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भव्य ग्रंथदिंडीने मराठी साहित्यप्रेमींच्या मनात अभिमान आणि आनंदाचे सूर फुलवले. संसद भवन ते तालकटोरा स्टेडियम हा ऐतिहासिक प्रवास करत, हजारो साहित्य रसिकांनी मराठी साहित्याच्या गौरवशाली परंपरेला वंदन केले.
या दिंडीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती लाभली. उद्घाटन प्रा. उषा तांबे (अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्षा) यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. मिलिंद मराठे (चेअरमन, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया) आणि मा. विकास खारगे (सांस्कृतिक सचिव, महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती होती. याशिवाय, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते करण्यात आले.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘लोकशाहीचे मंदिर ते साहित्याचे मंदिर’ या शीर्षकाखाली उत्साहात निघालेल्या या दिंडीने संमेलनाच्या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय केला. पारंपरिक पोशाख, मराठी साहित्याचे घोषवाक्ये हे या दिंडीचे आकर्षण ठरले.
ही ग्रंथदिंडी म्हणजे केवळ एक मिरवणूक नव्हती, तर ती मराठी भाषा आणि साहित्याच्या अभिमानाची प्रतिकृती होती. मराठी भाषेचा गोडवा आणि तिची समृद्ध परंपरा या दिंडीच्या प्रत्येक पावलांतून प्रतिबिंबित झाली.
अभिजात #राजधानीदिल्ली #अभिमानमराठी #ग्रंथदिंडीसोहळा
#माझीभाषामाझंसंमेलन #चलोदिल्ली #अभिजातमराठी #अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन







