SATARA ZP :सातारा जिल्हा परिषदेत भाजपने केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; राष्ट्रवादी फोडून चारही सभापती पदांवर कब्जा!

सातारा महाराष्ट्र वन वृत्तसेवा : Satara ZP सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात आज पुन्हा एकदा सत्तेचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘चाणक्य’ नीतीने विरोधकांना चारी मुंड्या चित करत, भाजप पुरस्कृत पॅनेलने विषय समिती सभापतींच्या चारही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला सदस्यांना आपल्या गोटात खेचून भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का देत करेक्ट कार्यक्रम केला आणि ऋषिकेश धायगुडे, तेजस्विनी कदम, लता कर्णे व ऋतुजा शिंदे यांची सभापती पदी बिनविरोध निवड करून आणले.
विरोधी गोटात सन्नाटा; काळ्या फिती लावून निषेध निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले होते. महाविकास आघाडीच्या सदस्यांनी भाजपवर सत्तेचा आणि प्रशासनाचा गैरवापर केल्याचा घणाघाती आरोप केला. “लोकशाहीचा गळा घोटला जात आहे,” अशा घोषणाबाजीसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी प्रक्रियेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला व काळ्या फिती लावून ज़िल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले सभागृहात विरोधक फिरकलेच नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादीच्या दोन शिलेदारांची साथ, सत्तेची गणिते बदलली या निवडणुकीतील सर्वात ‘खमंग’ चर्चा ठरली ती राष्ट्रवादीच्या लता कर्णे आणि ऋतुजा विराज शिंदे यांची. ऐनवेळी या दोन सदस्यांनी ‘घड्याळा’ची साथ सोडून भाजपच्या ‘कमळा’ला साथ देण्याचा निर्णय घेतला. या राजकीय कोलांटीउडीमुळे भाजपचे संख्याबळ वाढले आणि बक्षिसी म्हणून या दोन्ही सदस्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
पोलिसांचा पहारा आणि गुलालाची उधळण जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. कलम १४४ लागू असल्यामुळे कार्यकर्त्यांना लांब रोखण्यात आले होते. मात्र, जशी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा झाली, तसा भाजप कार्यकर्त्यांनी परिसरात एकच जल्लोष केला. “जयकुमार गोरे आगे बढो”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या विजयामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्या असून, विरोधकांसाठी हा मोठा राजकीय सेटबॅक मानला जात आहे.






