Heatwave Maharashtra उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी; नागरिकांसाठी प्रशासनाचा इशारा

राज्यात वाढत्या तापमानामुळे सतर्कतेचे आवाहन
Heatwave Maharashtra राज्यात दरवर्षी वाढणाऱ्या तापमानामुळे अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेत काय करावे ?
उष्णतेच्या लाटेच्या काळात नागरिकांनी दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी दर काही वेळाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. घराबाहेर जाताना डोके झाकण्यासाठी टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी पडदे, झडपा आणि सनशेडचा वापर करावा. तसेच हलकी, सैल आणि सुती कपडे वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाहेर प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांसारखी पेये नियमित घ्यावीत.
उष्माघाताची लक्षणे कोणती ?
उष्णतेमुळे अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे, चक्कर येणे किंवा मळमळ अशी लक्षणे दिसल्यास ती उष्माघाताची चिन्हे असू शकतात. अशा वेळी तात्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवून घरात हवा खेळती ठेवावी. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा तसेच वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करणे उपयुक्त ठरते.
कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. शक्यतो सकाळच्या किंवा पहाटेच्या वेळेत कामाचा जास्त भाग पूर्ण करावा. उन्हात काम करताना मध्ये मध्ये विश्रांती घेणे आवश्यक आहे. गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. तसेच उष्णतेच्या लाटेत जनावरांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गुरेढोरे सावलीत किंवा छावणीत ठेवावीत आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी.
उष्णतेच्या लाटेत काय करू नये ?
उष्णतेच्या काळात काही गोष्टी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कडक उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये पिणे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे. गडद रंगाचे, जाड आणि घट्ट कपडे घालणे टाळावे. तसेच लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. बाहेर तापमान जास्त असल्यास जड शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
उन्हाचा प्रकोप वाढत असताना नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असून सर्व नागरिकांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.





