Rain Trip
Rain Trip सातारला फुलांचे कास पठार, सडा वाघापूरचा उलटा धबधबा आणि बरेच काही
Rain Trip निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू होऊन महिना झाला आहे. नेहमीपेक्षा अगोदरच पर्जन्यराजाने आपली हजेरी लावल्याने पर्यटकांची खास करून तरुणाईची पावले या वर्षीही पावसाळी पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. सातारा परिसरात पावसाळ्यात नेहमीच पहायला मिळणारी धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे साऱ्यांच्याच तनामनाला साद घालू लागलेत. सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
जर आज तुम्ही या सर्वांचा विचार करून एखाद्या सुट्टीच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील पर्यटन करायचा Rain Trip तयार असाल तर सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा, भांबवली धबधबा, वजराई धबधबा, केळवली व सांडवली धबधबा, सडा वाघापूर उलटा धबधबा, एकीव धबधबा, ओझर्डे येथील नवजा धबधबा, धारेश्वर धबधबा, लिंगमळा धबधबा, पाटण-कोयनानगर परिसरातील धबधबा, रामघळ या सर्व धबधब्या बरोबर कास पुष्प पठार, सडा वाघापूर पठार, परमाळे पठार, चाळकेवाडी पठार, वाल्मीकी पठार, पाचगणीचे पठार, मरडेश्वर पठार, जुंगठी पठार, जगमीनचा तलाव, उरमोडी, धोम, कण्हेर धरण परिसर, तारळी धरणाचा परिसर, पिसानी डोंगररांग इतकी सारी ठिकाणे मी तुम्हाला सुचवतोय. कारण निसर्गाचे नैसर्गिक कोंदण लाभलेला सातारा जिल्ह्याचा हा सर्व परिसर हिरवागार होऊन आता पर्यटकांच्या Rain Trip साठी सज्ज झालेला आहे.
पावसाळा सुरु झाला की, बरसणाऱ्या धारांचा, अलौकिक निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा सर्वाना निर्माण होते. पण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसऱ्यांसाठीही धोका तर निर्माण करत नाहीये ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग आपण सातारा जिल्ह्यातील अशा पर्यटन ठिकाणांची माहिती पाहू कि तेथे गेल्यावर पावसाच्या सरीसोबत मनसोक्त एन्जॉय करता येतो. Rain Trip in Satara

ठोसेघर धबधबा : (Thoseghar Waterfall)
मराठ्यांची राजधानी सातारा या ठिकाणापासून २६ किमी अंतरावर असलेल्या (Thoseghar Waterfall) ठोसेघर धबधब्याकडे पर्यटकांची पावले हमखास वळतात. सातारावरून सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि सज्जनगड किल्ला पाहून आपण ठोसेघरकडे जाऊ शकतो. तारळी नदीवर असणारा हा धबधबा १५० ते १८० मी.उंचीवर वाहतो. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य असून हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. ठोसेघर धबधबा पाहून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला चाळकेवाडी पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्कीपासून वीज निर्मिती करणारे प्रकल्प आणि चाळकेवाडी पठार पाहता येतात.

वजराई भांबवली धबधबा 🙁 Vajrai Waterfall)
Rain Trip in Satara आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असणारा हा धबधबा सातारा शहरापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या भांबवली गावात आहे. ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १८४० फूट इतकी असून अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर मनमोहक आहे. उरमोडी नदीत उगम पावणाऱ्या या धबधब्याजवळ निरव शांतता, पक्षांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट पाहायला मिळतो. भांबवली वजराई धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी साता-याहुन कासमार्गे तांबी व पुढे भांबवलीला जाता येते. भांबवली ते धबधबा आपल्याला पायी चालावे लागते. भांबवलीच्या जंगलात रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर तसेच मोर-लांडोर यांचे दर्शन होते. या जंगलात हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मुरूडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल अशी वनौषधी झाडे-झुडपेसुध्दा आढळतात. हा ( Vajrai Waterfall) धबधबा पाहून आपण भांबवली व कास पुष्प पठार, बामणोली व शेंबडी बोटिंग, केळवली, एकीव, सांडवली, ठोसेघर धबधबा, घाटाई मंदिर, उरमोडी जलाशय व सज्जनगड अशी पर्यटन ठिकाणे पाहू शकतो.

केळवली व सांडवली धबधबा: (Kelwali and Sandwali WaterFall)
साताऱ्यापासून ३५ किमीवर असलेल्या या निसर्गरम्य धबधब्याकडे परळी फाट्यावरून उजव्या बाजूचा रस्ता केळवलीला जातो. उरमोडी जलाशयाच्या कडेकडेने निसर्गाची अनुभूती अनुभवत नित्रळ, खडगावपर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून काळेश्वरी घाटाने डोंगर उंचावरील केळवलीत जाता येते. वनराईत असलेल्या या गावातून पायी अर्ध्या तासात धबधब्याकडे जाता येते. साताराच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या या धबधब्याकडे जाणारी वाटच डोळ्यांचे पारणे फेडणारी असून या प्रवासातच सर्वत्र हिरवा शालू पांघरलेली भुई, त्यावर धुक्यांची चादर आणि आभाळातून पडणाऱ्या सरी असे वातावरण असते. केळवलीपासूनच काही अंतरावर सांडवली येथेही दोन टप्यात कोसळणारा आणखी एक धबधबा आहे. ताकवली गावातूनही नागमोडी पायवाटेने (Kelwali and Sandwali WaterFall) धबधब्यापर्यंत पोचता येते. या धबधबा मार्गावर जळू असल्याने पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

सडावाघापूर उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) धबधबा : (Reverse Waterfall Sadawaghapur)
सातारापासून ५० किमी अंतरावर पाटण तालुक्यातील (Reverse Waterfall Sadawaghapur) सडावाघापूर पठार म्हणजे पावसाळी पर्यटनाचा परमोच्च बिंदू. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे येथील पाणी उलट्या दिशेने वाहते. उलट्या धबधब्याचा आविष्कार असणारा हा धबधबा म्हणजे पावसाळ्यातील स्वर्ग आहे. जुलै ऑगस्टमध्ये पावसाला सुरु झाला कि निसर्गाची मनसोक्त लूटमार सुरु असल्याने सडावाघापुर या पठारावर पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडते. तारळे-पाटण रस्त्यावर असणाऱ्या व चाफळ विभागात मोडणाऱ्या सडावाघापुरला विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस, पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सडावाघापूरचे पठार हिरव्यागार गवताने आणि पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या रंगाच्या रानफुलांनी भरलेले असते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणाचा अनुभव येथे घेता येतो. यंदा मे महिन्यापासूनच पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने हा उलटा धबधबा सुरू झाला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेले, प्रचंड उल्हासित करणारे हे पर्यटन स्थळ सर्वांना खेचून आणत आहे.

एकिव धबधबा: (Ekiv Waterfall)
सातारापासून २५ किमी अंतरावर एकिव धबधबा कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते. हा धबधबा लहान तसेच अतिशय सुरक्षित असून कुटुंबातील व्यक्तीसोबत मनसोक्त आनंद घेण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. कास पुष्पपठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा पहिलाच पाहिजे. हा धबधबा पाहून आपण यवतेश्वर, शिवपेटेश्वर ही मंदीरे, कास पठार, कास तलाव, वजराई धबधबा, बामणोली व तापोळा बोटिंग तसेच वनदुर्ग वासोटा ही पर्यटन स्थळे पाहू शकतो. (Ekiv Waterfall) येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे.

ओझर्डे धबधबा:(Ozarde Waterfall)
ओझर्डे या धबधब्याला भेट देण्यासाठी सातारा येथून उंब्रज मार्गे- मल्हारपेठ- पाटण- कोयनानगर- ओझर्डे असे जाता येते. पाटण तालुक्यातील पर्यटकांसाठी एक खास आकर्षण असणारा ओझर्डे धबधबा (Ozarde Waterfall) कोयना धरणाजवळ आहे. कोयना धरणाच्या बाजूने नवजाकडे जाताना ओझर्डे धबधबा ८०० फुटावरून कोसळतो. कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा धबधबा येत असल्याने वनविभागाने या ठिकाणी सुरक्षितेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. या ठिकाणाहून कोयना धरणाचा विहंगम दृश्य असणारा शिवसागर जलाशय पाहता येतो तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही येथेच जवळच आहे. धबधब्याच्या जवळच असणारे रमणीय दृश्य पर्यटकांना मोहून टाकते. या ओझर्डे धबधबा पर्यटनाबरोबर आपण पाटण जवळचे घेरादातेगड आणि मोरगिरी उर्फ गुणवंतगड हे किल्ले आणि धारेश्वर धबधबा पाहू शकतो.

धारेश्वर: (dhareshwar Cave)
धारेश्वर हा पाटणपासून १४ तर सातारापासून ८० किमीवर आहे. धारेश्वर डोंगरामध्ये (dhareshwar Cave) खोदलेल्या लेण्या असून या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे तसेच एक मठ व भक्तांसाठी खोल्या आहेत. पावसाळ्यात हिरवागार झाल्यामुळे अर्धवर्तुळाकार असलेला हा डोंगर अतिशय नयनरम्य दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा असून येथील पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे आपले मन प्रसन्न करून टाकतात. येथे येणाऱ्यांना राहण्यासाठी पाटण शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी सोय आहे. याठिकाणी स्वत:ची गाडी असणे आवश्यक आहे.

लिंगमळा धबधबा: (Lingmala Waterfall Panchgani)
महाबळेश्वरच्या निसर्गरम्य हिल स्टेशनमध्ये खडकाळ पर्वतांनी आणि हिरवळीने वेढलेला लिंगमाला धबधबा शहरी जीवनापासून दूर आराम करू इच्छिणाऱ्या लोकांना शांत वातावरण बहाल करतो. सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गाने आपल्याला तेथे जाता येते. हा धबधबा दोन भागात विभागलेला आहे. खालचा छोटा धबधबा पोहण्यासाठी आहे , तर वरचा मुख्य धबधबा ५०० फूट उंच आहे. जून ते सप्टेंबर या दम्यान हा धबधबा नेत्रदीपक असतो. पर्यटक टॅक्सी किंवा ऑटो-रिक्षानी किंवा चालत अर्ध्या तासात तेथे पोहोचू शकतात. या धबधब्याला भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क आहे. जर तुम्ही कॅमेरा सोबत घेऊन जात असाल तर तुम्हाला त्यासाठी १० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. पर्यटक सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत या धबधब्याचा आनंद घेऊ शकतात. लिंगमाला धबधबा (Lingmala Waterfall Panchgani) पाहून झाल्यावर महाबळेश्वर मंदिर, वेण्णा तलाव, एलिफंट्स हेड पॉइंट, मॅप्रो गार्डन, प्रतापगड किल्ला आणि पाचगणी हिल स्टेशन या ठिकाणांना भेटी देऊ शकतो.
तर या सर्व पर्यटन ठिकाणांनी बहरलेला सातारा जिल्हा आहे.Rain Trip In Satara पावसाळी पर्यटन आणि धबधबा असे समीकरणच तयार झाले आहे. हिरवागार निसर्ग, गवताचे गालिचे, धुक्याची चादर, मन व तण चिंब करणारा पाऊस, धुक्यात हरवलेली वाट, पवनचक्की, सोबत झोंबणारा थंडगार वारा पावसाळ्यात पर्यटकांना साद घालतो. चला तर मग वरील सर्व सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देऊन हा पावसाळा संस्मरणीय बनवूया. 
लेखन – सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव, गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
९९७५७५९३२५







