Iran Israel War impact महायुद्धामुळं बळीराजा संकटात! इराण-इस्रायल तणावाचा भारतीय शेतीमालाला मोठा फटका;

Iran Israel War impact : JNPT बंदरात हजारो टन माल अडकला- कांदा,केळी व द्राक्षसह भाजीपाला प्रभावित
मुंबई/नवी मुंबई | विशेष प्रतिनिधी
Iran Israel War impact इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका आता भारतीय शेती क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आखाती प्रदेशात बिघडलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे निर्यातीसाठी राज्यातून आलेला हजारो टन शेतीमाल गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांदा, केळी, द्राक्षे आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसह निर्यातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सागरी मार्ग असुरक्षित; ‘होर्मुझ’च्या भीतीने जहाजे थांबली
युद्धाचा भडका उडाला असताना आखाती प्रदेशातील जीवन वाहिनी असलेल्या ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) या जगातील अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर इराणने निर्बंध आणल्याने आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुबई, इराण आणि कतार या देशांकडे जाणारी शेकडो जहाजे सुरक्षिततेच्या कारणास्तव जेएनपीटी बंदरातच नांगर टाकून उभी आहेत. शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरील बुकिंग थांबवल्याने बंदराच्या यार्डमध्ये कंटेनर्सचा अडकून राहिले आहेत नवीन मालाला जागा मिळणे कठीण झाले आहे.
नाशवंत मालाचे संकट: कांदा आणि द्राक्षे धोक्यात
जेएनपीटी बंदरात सध्या महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि सांगली, सातारा सोलापूर पट्ट्यातून आलेला कांदा ,केळी आणि द्राक्षांचे सुमारे १ ० ० ० हून अधिक कंटेनर्स अडकले आहेत. हे सर्व कंटेनर्स रेफ्रिजरेटेड (Reefer) असून, त्यातील माल टिकवून ठेवण्यासाठी निर्यातदारांना दररोज प्रति कंटेनर ७ ते ८ हजार रुपये अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे. माल वेळेत रवाना झाला नाही, तर तो बंदरातच सडून जाण्याची भीती असून Iran Israel War impact यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक भांडवल धोक्यात आले आहे.
वाहतूक खर्च दुप्पट, विमा हप्ते कडाडले
युद्ध परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी ‘वॉर रिस्क सरचार्ज’ (War Risk Surcharge) लागू केला आहे. परिणामी, मालवाहतुकीचे दर ४० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. तसेच, आखाती देशांत जाणाऱ्या मालाचा विमा उतरवण्यास विमा कंपन्या कचरत आहेत. बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांचे सुमारे ६,००० कोटी रुपयांचे पेमेंट इराणमध्ये अडकल्याने बाजारात मोठी आर्थिक चणचण भासू लागली आहे.
स्थानिक बाजारपेठेवर मंदीचे सावट
निर्यात होणारा माल बंदरातच अडकल्याने त्याचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. जर हा माल निर्यात न होता स्थानिक बाजारात परत आला, तर आवक अचानक वाढून कांदा आणि फळांचे भाव गडगडण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच अस्मानी संकटात असलेला शेतकरी आता या ‘सुलतानी’ युद्धामुळे अधिकच हवालदिल झाला आहे.
“जर हे युद्ध अधिक काळ लांबले, तर भारतीय निर्यातीला आफ्रिका खंडाला वळसा घालून जाणाऱ्या प्रदीर्घ मार्गाचा अवलंब करावा लागेल. यामुळे प्रवासाचा वेळ २० दिवसांनी वाढेल आणि मालवाहतुकीचा खर्च दुप्पट होईल, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसेल.” असे निर्यातदार तज्ञ सांगत आहेत.
शेतकऱ्याला याची सर्वाधिक झळ- बाळासाहेब देशमुख
आम्ही गेल्या पंधरादिवसापूर्वी कांदा दुबईला निर्यात केला होता त्यावेळी कांद्याचे दर कमी होते, आता युद्धामुळे आखाती देशात तुटवडा निर्माण झाला असून कांद्याचे दर वाढले आहेत मात्र जेएनपीटी मधून कंटेनर आखाती व मध्य आशिया देशात जात नसल्याने या वाढलेल्या दराचा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही. शेतमालाचे १ हजार कंटेनर सध्यातरी निर्यातीच्या प्रतीक्षेत बंदरात अडकून पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्याला या युद्धाचा अप्रत्यक्ष फटका बसत आहे. – बाळासाहेब देशमुख (शेतीमाल निर्यातदार शेतकरी)





