Election News
Election News उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र
साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला व्यक्त्त
Election News शिवसेना सातारा जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या मेळाव्यापूर्वी शहरातील शिवतीर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि शहिद जवान स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही असे ठणकावून सांगत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.ही महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्युज आघाडी आहे. कोण काय बोलतो हे त्यांनाच माहीत नाही. फक्त गोंधळ आणि दिखावा असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
“माझ्या शिवसैनिकांवर आणि माझ्या भारत देशातील सैनिकांवर मला सार्थ अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर आम्ही चाललो आहोत. आमचं सरकार विकासाचं आणि जनतेच्या हिताचं आहे.”
शिंदे म्हणाले, “2019 साली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला धोका दिला, पण आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन वेगळा मार्ग निवडला. आज महाराष्ट्रात महायुतीचे 232 आमदार हे जनतेच्या विश्वासाचं प्रतिक आहे. आपण केलेल्या कामांच्या बळावर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यासाठी आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेतून सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केले.
सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर फेस्टिव्हल आयोजित केला होता, या फेस्टीव्हलला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल होणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईल. मुंबई-पुण्याला नोकरीसाठी जाणारा युवक पुन्हा आपल्या गावातच थांबेल. कोयना नदीवर तीन पूल बांधत असून पर्यटक आणि पर्यटनालाही त्याचा निश्चित लाभ होईल आणि सातारा जिल्ह्याचा विकास होईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
दिवाळीनंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. बूथप्रमुख आणि गटप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची लवकरच आखणी करा. हेच कार्यकर्ते शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून निवडणुकीचा विजय निश्चित करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, अंकुश बाबा कदम, सिद्धाराम मेहेत्रे, राजेंद्र यादव, शारदा जाधव, यशराज देसाई तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shivsena #Satara #EknathShinde #Maharashtra #Shivsena #शिवसेना #Shambhuraj Desai #Mahesh Shinde #महेश शिंदे #Chandrahar Patil #पै.चंद्रहार पाटील





