तेजस लेंभे/प्रतिनिधी
वाघोली ता. कोरेगाव येथील जुना पूल कालबाह्य झाल्याने नऊ महिन्यापूर्वी पाडण्यात आला आणि नवीन पुलाचे काम चालू करण्यात आले.पूल पाडल्यानंतर पुलाच्या शेजारी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे.या पर्यायी मार्गावर आज पहाटे पिकअप गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.हा पर्यायी मार्ग अत्यंत निकृष्ट व धोकादायक असूनही वाहनचालकांना जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
सदर मार्गावर कोणतेही दिशादर्शक फलक, सूचना फलक किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पुलाच्या शेजारील हा मार्ग तीव्र उताराचा असल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. अंधारात किंवा पहाटे वाहनचालकांना उताराचा अंदाज न आल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.तसेच इतर पर्यायी मार्ग इतके निकृष्ट झाले आहे की रस्त्यात खड्डे आहेत. की खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही त्यामुळे वाहनचालक जीवावर उदार होऊन या जवळच्या मार्गाचा पर्याय निवडतात.
या पुलाचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असून, काम करणाऱ्या ठेकेदाराने व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी शिवसेनेने पुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथे आंदोलन केले होते. तसेच आमदार सचिन पाटील यांनीही या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तात्काळ दिशादर्शक फलक लावणे,तीव्र उतार कमी करणे व प्रकाश व्यवस्था करणे आणि पुलाचे काम जलद गतीने व दर्जेदार पूर्ण करण्याची मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
