Actor Sayaji Shinde Tree Plantation Movement: वाठार स्टेशनचा ‘ग्रीन’ पॅटर्न! यमाई टेकडी हिरवाईने नटणार; अभिनेते सयाजी शिंदे आणि जिल्हाधिकारी रमले वृक्षारोपणात

यमाई ट्री फाउंडेशनच्या मोहिमेला मान्यवरांचे बळ
वाठार स्टेशन | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Actor Sayaji Shinde Tree Plantation Movement निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची अत्यंत गरज आहे. वाठार स्टेशन येथील वाग्देव महाराज भूमीत यमाई ट्री फाउंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून यमाई टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत असून, लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धनही सातत्याने केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात यमाई टेकडी परिसर हिरवाईने नटलेला दिसेल. या उपक्रमाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. वाठार स्टेशन येथील यमाई देवी मंदिर परिसरात आयोजित भव्य वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते.
यमाई ट्री फाउंडेशनच्या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील भूभाग मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादित करण्याचे स्वप्न असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनात सहभाग घेणे आवश्यक आहे. यमाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. भविष्यात या भाविकांना झाडांच्या सावलीतून मंदिराकडे जाण्याचा आनंद मिळेल. वाठार स्टेशन ग्रामस्थांनी आणि यमाई ट्री फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, त्यातून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येकाने वयाएवढी झाडे लावून जगवावीत: सयाजी शिंदे
वृक्षप्रेमी व सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, झाडे ही केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाने आपल्या वयाएवढी झाडे लावण्याचा संकल्प करावा आणि लावलेली झाडे जगवावीत. निसर्ग आपल्याला मोफत ऑक्सिजन, सावली व जीवनावश्यक साधने देत असतो. झाड म्हणजे आईचे रूप आहे, त्यामुळे निसर्गाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
‘बोडके वाठार’ आता ‘हिरवे वाठार’ म्हणून ओळखले जाईल: अमोल सातपुते
वन अधीक्षक अमोल सातपुते यांनी यमाई ट्री फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना स्पष्ट केले की, फाउंडेशनने दोन वर्षांपूर्वीपासून या परिसरात वृक्षलागवडीचे काम हाती घेतले असून, केवळ झाडे लावण्यावर न थांबता ती जगवण्याचेही महत्त्वपूर्ण काम केले आहे. पूर्वी बोडके वाठार म्हणून प्रसिद्ध असणारे गाव यापुढे हिरवे वाठार म्हणून नावारुपास येईल. या उपक्रमाला यापुढेही वन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य व पाठबळ दिले जाईल.
महसूल, वन विभाग आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई भोसले, पं. स. सदस्या अनिता भोईटे, कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, कोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मंडलाधिकारी रेशमा चव्हाण, अंकुशराव जाधव, सरपंच प्रशासक सीमा चव्हाण, उपसरपंच प्रशासक इर्शाद मोमीन, ग्रामसेवक एस. डी. जाधव, वाग्देव विद्यालय संकुलाच्या प्राचार्य नीलिमा जमदाडे, महसूल अधिकारी व महसूल सेवक, वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, अजय कांबळे, चंद्रिका लोहार, रूपाली परदेशी यांच्यासह यमाई ट्री फाउंडेशनचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यमाई टेकडी परिसरात झालेल्या या वृक्षलागवडीमुळे परिसराच्या पर्यावरणीय समृद्धीत भर पडणार असून, भविष्यात हा परिसर निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.













