August Kranti Din 2026: भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सुवर्णपहाट! ‘चले जाव’ आंदोलन अन् ऑगस्ट क्रांतीचे ऐतिहासिक योगदान; वाचा विशेष लेख

देऊर | महाराष्ट्र वन न्यूज (विशेष लेख – सहा. प्रा. सूर्यकांत शामराव अदाटे)
August Kranti Din 2026: जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणाऱ्या बोल्शेविक क्रांती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती या जागतिक घडामोडींप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ‘ऑगस्ट क्रांती’ आणि ‘चले जाव आंदोलना’ला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना दिलेला ‘भारत छोडो’ आणि देशवासियांना दिलेला ‘करा किंवा मरा’ (Do or Die) हा नारा भारतीय स्वातंत्र्याची मंगल पहाट समीप आणणारा ठरला.
आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती August Kranti Din ही केवळ ब्रिटिशांविरोधात नसून वसाहतवाद, वर्णवाद आणि शोषक प्रवृत्तींविरोधात पेटून उठलेली एक ऐतिहासिक लोकचळवळ होती.
वर्धा योजना ते मुंबईतील ‘आझाद मैदान’: आंदोलनाची पार्श्वभूमी
क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर आणि दुसऱ्या महायुद्धातील बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्यासाठी काँग्रेसने ‘छोडो भारत’ आंदोलनाची आखणी केली. या आंदोलनाचा पाया वर्धा येथील सेवाग्राममधील ‘बापू कुटीत’ ९ जुलै रोजी रचला गेला. १४ जुलै १९४२ रोजी या ठरावाला मंजुरी मिळाली, ज्याला ‘वर्धा योजना’ म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान) मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक अधिवेशन पार पडले. यावेळी पंडित नेहरूंनी “या लढ्यात आता माघार नाही…” अशी गर्जना करत देशवासियांमध्ये अभूतपूर्व चेतना निर्माण केली.
नेत्यांची अटक, जनक्षोभ अन् प्रतिसरकारची स्थापना
८ ऑगस्टच्या मध्यरात्री इंग्रज सरकारने महात्मा गांधींसह अनेक प्रमुख नेत्यांना अटक करून पुण्यातील आगाखान पॅलेस व विविध तुरुंगांत डांबले. मात्र, ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच जनता स्वतः रस्त्यावर उतरली. काँग्रेसचे प्रमुख नेते तुरुंगात असताना युवा नेत्या अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचा August Kranti बिगुल वाजवला.
या आंदोलनात तब्बल ९ लाख लोकांनी स्वतःहून अटक करवून घेतली. तर दुसरीकडे जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, अशोक मेहता यांसारख्या समाजवादी नेत्यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यात ‘प्रतिसरकार’ (पत्री सरकार) स्थापन करून ब्रिटिश सत्तेच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान दिले.
स्वातंत्र्याचा सुकर झालेला मार्ग अन् आजचे आव्हान
ऑगस्ट क्रांती आणि चले जाव आंदोलनाच्या तीव्रतेमुळे ब्रिटिशांना आपण भारतात जास्त काळ टिकू शकत नाही, याची स्पष्ट जाणीव झाली. दयानंद विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. मलिक यांच्या मते, या चळवळीने भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर केला. या आंदोलनातूनच देशाच्या राजकारणाला पुढील ५० वर्षे दिशा देणारे नवे तरुण नेतृत्व उदयास आले.
पुढे क्लमेंट अटलींचे सरकार, त्रिमंत्री योजना आणि ३ जून १९४७ ची माऊंटबॅटन योजना यांमधून अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र, आजच्या काळात देशाला भ्रष्टाचार, महागाई आणि दडपशाही यांपासून मुक्त करून शोषणमुक्त, समतावादी व बंधुभाव जपणारा समाज निर्माण करणे, August Kranti Din हीच ऑगस्ट क्रांतीतील हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल.
(लेखक: सहा. प्रा. सूर्यकांत शामराव अदाटे, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, मो. ९९७५७५९३२५)











