Satara Zp Update : सभापती निवडीनंतर ‘वॉर’ सुरूच: मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांचा भाजपवर जोरदार पलटवार

सातारा: Satara Zp Update सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत भाजपने बाजी मारल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होताच, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. व पुन्हा लढू, पुन्हा जिंकू…कारण लढाई अजून संपलेली नाही..! असा निर्धार व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्देउपस्थित करीत फुटलेल्या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करणार हे निश्चित असल्याचे स्पष्ट केले तर भाजपने सुरुवात केली शेवट आम्ही करणार असा इशारा पुन्हा दिला.
‘पुढे पुढे पहा काय होते ते’: मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “सभापती निवड झाली म्हणजे जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला असा होत नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, त्यामुळे ‘आगे आगे देखो होता है क्या’, हे लवकरच स्पष्ट होईल.”
लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप: देसाई आणि पाटील यांनी या संपूर्ण निवड प्रक्रियेला ‘हुकूमशाही’ म्हटले. “भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सत्तेचा वापर करून आणि प्रशासनाला हाताशी धरून हे विजय मिळवले आहेत. ही लोकशाही नसून लोकशाहीची पायमल्ली आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
संघर्ष आता उघड: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट मंत्र्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. देसाई आणि पाटील यांनी सांगितले की, भाजप ज्या पद्धतीने ‘फोडाफोडी’चे राजकारण करत आहे, ते आता खपवून घेतले जाणार नाही. आम्ही या अन्यायाविरुद्ध आणि भाजपच्या दडपशाहीविरुद्ध शेवटपर्यंत लढा देऊ.
आक्रमक पवित्र्याचे संकेत: या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले, तरीही भविष्यातील राजकीय संघर्षासाठी सज्ज राहण्याचे संकेत दिले आहेत. भाजपच्या या ‘गेम प्लॅन’ला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
या पत्रकार परिषदेला खासदार नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी उपाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, उदयसिंह पाटील, सुरेंद्र गुदगे, अनिल देसाई, संदीप मांडवे व सेना राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात काय तर जिल्हा परिषदेत सभापती पदे जिंकून भाजपने जरी वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला असला, तरी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सातारा जिल्हा परिषदेचे राजकारण आगामी काळात अधिक धगधगते राहण्याची चिन्हे आहेत.






