Mumbai News
रसिकाश्रय संसंस्थेच्या प्रयत्नातून दुःखावर एक फुंकर, उपक्रमाचे तिसरे वर्ष
Mumbai News :घाटंजी (जि. यवतमाळ) येथील रसिकाश्रय संस्था गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी “जीवाची मुंबई” हा अभिनव सामाजिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध घटकांना मुंबई दर्शन घडवून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो.
Mumbai New पहिल्या वर्षी निराधार वृद्धांना मुंबई सहलीसाठी नेण्यात आले होते. या वेळी वृद्धांना मुंबई दर्शन घडविण्यात आले तसेच मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घडवून आणण्यात आली होती. वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला.
दुसऱ्या वर्षी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू महिला कामगारांसाठी थेट विमान प्रवासाचे आयोजन करण्यात आले. या महिलांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. याच वेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनीही महिलांना भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवले. या सहलीदरम्यान महिलांनी ताज हॉटेल मुंबई येथे चहा-नाश्त्याचा आनंद घेतला. श्रमिक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, हाच या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
यावर्षी “जीवाची मुंबई” उपक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी ही सहल आयोजित केली गेली या माध्यमातून ३० एकल महिलांना मुंबई दर्शन घडवण्यात आले, कृषी व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या या महिलांवर पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी येते. कर्जाचा डोंगर, सामाजिक एकाकीपणा आणि जगण्याचा संघर्ष यामध्येही त्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झगडत राहतात.
या महिलांच्या संघर्षाला सलाम करत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण यावेत, या भावनेतूनच “दुःखावर एक फुंकर” देणारी ही आनंदी सफर आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमादरम्यान महिलांना मुंबईतील विविध ठिकाणांचे दर्शन घडवून त्यांना मानसिक आधार व नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला गेला, महिलांना विमान प्रवास ते मुंबईत विविध ठिकाणी भेटी यातून त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला.
या आनंदी सफरीच्या निमित्ताने संबंधित मान्यवरांनी महिलांना सदिच्छा भेट द्यावी व थोडा वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन रसिकाश्रय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, हाच या सामाजिक कार्याचा खरा उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले.
