उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो. : प्रा.अनिल अहिवळे

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात
उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो असे विचार प्रा.अनिल अहिवळे यांनी व्यक्त केले.
शंकरराव जगताप आर्टस अँण्ड कॉमर्स महाविद्यालय,वाघोली आणि छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय पिंपोडे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्येमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत आयोजित “वाचन कौशल्य कार्यशाळा २०२५” उत्साहात संपन्न झाली.व्याख्याते प्रा.अनिल अहिवळे यांनी लेखक आपल्या भेटीला या विषया बरोबर वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास कसा होतो यावर सखोल मार्गदर्शन करताना “उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो. वाचनामुळे विचारांना विधायक दिशा प्राप्त होते.” असे प्रतिपादन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.व्ही.घाडगे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा उपयोग केवळ ज्ञानसंपादनासाठी नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “वाचनासोबत चिंतनाची सवय लावल्यास जीवन अधिक समृद्ध होते.” कार्यशाळेने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीविषयी नवचैतन्य निर्माण केले असून, त्यांना वाचनाची महत्त्वपूर्ण सवय अंगीकारण्याची प्रेरणा दिली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक पी.आर.रगडे, सूत्रसंचालन प्रा.स्मिता माने यांनी केले. आभार पत्रकार रणजित लेंभे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.पी.सी.कुंभार परिश्रम घेतले. प्रा.बिपिन वैराट सह या कार्यशाळेला महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी उपस्थित होते.





