Sahitya Samelan: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

Sahitya Samelan: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

Sahitya samelan: राजधानीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नवी दिल्ली, दि.23 : Sahitya samelan भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

राजधानीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, निमंत्रक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा यांच्यासह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी – श्री.शिंदे

मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे. सर्वसामान्यांच्या व्यवहार व शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये दिले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. राज्य सरकारने राज्यातल्या ग्रंथालयांना अनुदान वाढवून दिले आहे. नवलेखकांकडून कथा, कादंबरी, कवित या सर्वच क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यामधून वर्तमानाचा वेध घेवून आजच्या पिढीचे प्रश्न मांडण्याचे धाडस केले जात आहे. या लेखकांच्या साहित्याची दखल घेण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे. मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जावे, अशी सूचना करतानाच रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीतील विविध साहित्यप्रवाहांचा संगम आहे. महाराष्ट्राच्या भूमीत संतांनी भक्ती संप्रदाय निर्माण केला, तर, वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला. विविध लोककलांनी मराठी भाषा समृद्ध होत गेली. आता मराठी भाषेच्या अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मराठीचा वेलू गगनावरी नेण्यासाठी जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करून श्री. शिंदे म्हणाले, मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण टोकाचे आग्रही असले पाहिजे. विविध घटकांच्या एकत्रिकरणातून मराठी संस्कृती आणि समाज तयार होतो. तो टिकविण्यासोबतच वाढविला पाहिजे. दोन वर्षांनी 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. येत्या दोन वर्षात मराठी भाषेने गरुड झेप घ्यावी, मराठी ही आई, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, बहिणाबाई, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी सर्वांचीच भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत झालेले हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहील, असे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू – उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असते ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत काही उणीवा असतील तर त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठीची उपयुक्तता वाढावी, ती बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असेही श्री पवार यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. विठ्ठल भक्तांचा मेळा दरवर्षी पंढरीत जमतो. त्याचप्रमाणे, संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी साहित्यिकांचा मेळा साहित्य पंढरी निर्माण करतो. भक्तिभाव, समाधान आणि नवीन ऊर्जा या दोन्ही पंढरीचे विशेष गुणधर्म असून साहित्य संमेलनातून मिळणाऱ्या उर्जेतून नवे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यिकांच्या लेखणीत समाजाला जागृत करण्याची, योग्य दिशा देण्याची क्षमता असते. तिचा वापर सकारात्मक बदलासाठी व्हावा. नवोदित लेखकांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका प्रथितयश साहित्यिकांनी घ्यावी. तसेच साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मराठी भाषिक तरुणांचा सहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.

सध्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढी समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिकही होते. तुळापूर, वढूला त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन लवकरच सुरू होत असल्याची माहिती देऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, साहित्याचा खरा संस्कार या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले चाकावरचे साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम असून यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त अशा यात्री संमेलनाचे नियमित आयोजन व्हावे. त्यास शासनाकडून मदत केली जाईल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून या विभागाचा कार्यभार सांभाळताना आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठीच्या विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. देशाच्या राजधानीत मराठीचा जल्लोष होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री दर्डा म्हणाले, मराठी वाचन संस्कृती जगवण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे. लोकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथ विक्रीस प्रोत्साहन द्यावे. नव्या पिढीकडून मातृभाषेचा वापर वाढवण्यासाठी शिक्षणात मराठीचा आग्रहाने अंर्तभाव करणे आवश्यक आहे.

मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतिशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्ञान क्षेत्र जर समृद्ध करायचे असेल तर ज्ञानाप्रती तळमळ, आस पाहिजे. तसा समाज ज्ञानसंपन्न होतो. सीमा प्रदेशात संस्कृतीचे अभिसरण घडत असते. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेह, प्रेम वाढवूया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.

रिद्धपूर येथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावे, त्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद व्हावी, बृहनमहाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे, बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी आदी बारा ठराव यावेळी करण्यात आले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)